सिडनी –सिडनी कसोटी बरोबरीत सोडवत भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. मात्र, न्यूझीलंड संघाकडून भारताला चांगलेच आव्हान मिळाले आहे. त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवल्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता भारत व न्यूझीलंड यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चांगलीच स्पर्धा रंगणार आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही भारताची पाचवी मालिका आहे. सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिका व क्रमवारी जाहीर केली आहे.
आतापर्यंत या स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने जिंकले आहेत. भारताचे 400 गुण असून ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर 332 गुण आहेत. गुणांमध्ये फरक असूनही ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ जास्त गुण असूनही विजयाच्या टक्केवारीच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंड संघाने सात सामने जिंकले असून त्यांच्या नावावर 420 गुण जमा झाले असले तरीही ते यशाच्या सरासरीमुळे भारताच्या नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
विजयाच्या टक्केवारीनुसार ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आहे. तर भारत दुसऱ्या आणि न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची चुरस आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात जो निकाल लागेल त्यावर ही क्रमवारी नव्याने तयार होणार आहे.