पुणे – महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) राज्याच्या विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पासंदर्भात आराखडा तयार केला असून यामध्ये मुंबई ते पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुध्दा हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याहून मुंबईला एक तासांत पोहचता येणार आहे.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव संजय कुमार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एमआरआयडीसी मार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे “महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी बैठकीत सादरीकरण केले.
यामध्ये मुंबई-पुणे (हायस्पीड रेल्वे प्रकल्प एक तास प्रवास), रत्नागिरी-पुणे, औरंगाबाद-चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव, पुणे-औरंगाबाद, पुणे-नांदेड, चिपळूण- कराड (नवीन लाइन), वैभववाडी-कोल्हापूर (नवीन लाइन) या प्रकल्पाचा समावेश आहे.
पुणे- नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या. पुणे आणि नाशिक दोन्ही जिल्हे कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात समृद्ध आणि पुढारलेले जिल्हे आहेत.
हा रेल्वे मार्ग पुणे आणि नाशिक येथील औद्योगिक क्षेत्र आणि तिर्थक्षेत्रांना जोडणारा असून भाविकांना शिर्डीला जाणेही सोयीचे होईल. रेल्वे मार्ग विकसित झाल्यास या भागातील आर्थिक विकास गतिमान होऊन महसूल वाढीबरोबरच या भागातील कृषी, पर्यटन, उद्योग वाढीस, कृषी-औद्योगिक उत्पादनाच्या वाहतूक व निर्यातीस मोठी मदत होईल, रोजगार निर्मितीस चालना मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.