महाजनादेश यात्रेसाठी प्रदेश कार्यकारिणीला गळ : सातारा, वाई, कराड येथे सभांचे नियोजन
सातारा – पश्चिम महाराष्ट्रातील महापुरामुळे स्थगित झालेली भाजपची महत्त्वाकांक्षी महाजनादेश यात्रा सातारा जिल्ह्यात आणण्यासाठी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने पुन्हा प्रदेश कार्यालयाकडे जोर लावला आहे. येत्या 15 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा दौऱ्याचे संकेत असून सातारा, कराड, वाई या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची राळ उडणार आहे. गणेशोत्सवानंतर आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने मुख्यमंत्र्याचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा लवकर घेण्याची लगबग सुरू आहे.
भाजपने पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पाडत थोरल्या पवारांचे विश्वासू शिलेदार हातोहात पळवले. साताऱ्यात माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपवासी झाले तर खा. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची मॅरेथॉन चर्चा सुरू आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शिवबंधनाची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात विधानसभेला चौकार मारायचाच या इराद्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील नाराज छोटे-मोठे सरदार भाजपच्या वळचणीला आणले आहेत.
राष्ट्रवादीला पत वाचवायची असून कॉंग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. यंदा महापुराने सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवत सुमारे दहा हजार कोटीचे नुकसान केले आहे. त्यावेळी भाजपची विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्र दरम्यानची महाजनादेश यात्रा स्थगित करून मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यांना युद्धपातळीवर पूरस्थितीत उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. मराठवाडा व विदर्भात मुख्यमंत्र्यांनी 104 रॅली व 228 सभा घेतल्या.
आता सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये महाजनादेश यात्रेचा उरलेला टप्पा पूर्ण केला जाणार आहे. 15 तारखेला मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा निश्चित व्हावा यासाठी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गळ घातली आहे.
येत्या 12 तारखेला गणरायाचे विसर्जन आणि त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा तातडीने व्हावा यासाठी जिल्हा कार्यकारिणीच्या शासकीय विश्रामगृहातील बैठका वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यासाठी दादा आग्रही
मुख्यमंत्र्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा हा दादांच्या चाणक्यनीतीचा प्रयोग आहे. सर्व नाराज शिलेदारांना एकाच वेळी वळचणीला आणून राष्ट्रवादीला प्रत्यक्ष लढतीपूर्वीच धोबीपछाड देण्याची रणनीती आहे. अर्थात पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. मात्र, साताऱ्याचे राजकीय महत्त्व व राजघराण्याचे वर्चस्व अशा परिघात भाजप आपल्या रणनीतीचा डंका वाजवण्याची संधी सोडणार नाही. खा. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा पेच या दौऱ्याने सोडविला जाईल, अशा अटकळी बांधल्या जात आहेत.
भाजपच्या तंबूतही “मानापमान’ नाट्य
जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असली तरी सातारा व माण विधानसभा मतदारसंघात मतभेदाचे ढोल वाजू लागले आहेत. माजी आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप प्रवेश करून “आमचं ठरलंय’ या मोहिमेची हवा काढून घेतली आहे. मात्र, भाजप प्रवेश झाला म्हणजे तिकीट मिळाले, असे होत नाही. तिकीट मलाच मिळणार, असा दावा डॉ. दिलीप येळगावकर यांनी केला आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधातील दीपक पवार यांची असहकाराची तलवार म्यान व्हायला तयार नाही. भाजपमधील ही वाढती सुंदोपसुंदी पक्षाच्या वाटचालीला धोकादायक असून चंद्रकांत पाटलांना स्वतः “डॅमेज कंट्रोल’ करावे लागणार आहे.