सातारा, दि.8
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कोट्यावधीची फसवणूक केलेल्या कडकनाथ प्रकरणी दररोज नवे खुलासे होत असताना शुक्रवारी पाटण पोलिसांनी घेतलेल्या “यू टर्न’मुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकरता येत नाही. राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा आणि सांगली भाजपा युवा मोर्चाचा अध्यक्ष असलेल्या सागर खोत याच्याविरोधात सातारा जिल्ह्यातील पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटण पोलिसांनी अजब स्पष्टीकरण देत सागर यांचे नाव चुकून फिर्यादीत टाकले असल्याचे सांगून या प्रकरणात नव्या वादाला फोडणी दिली आहे.
पाटण तालुक्यातील जवळपास 180 शेतकऱ्यांनी महा रयत या कंपनीच्या कडकनाथवर भरवसा ठेवून अंडी उत्पादन व कोंबडी पालन अशा व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. कडकनाथ कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी पाटण पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाला गती मिळाली होती. त्यानंतर पाटण पोलिसांनी सागर खोत याच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर कोयनेच्या पाण्यातून असा काय बुडबुडा आला त्याने चक्क फिर्यादीतून सागर खोत याचे नावच वाहून गेल्याची परिस्थीती आहे. यावर पाटणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावने यांनी सागर यांचे नाव चुकून फिर्यादीत आल्याचे अजब असे स्पष्टीकरण दिल्याने या प्रकरणाला वेगळा वास येत असल्याचे बोलले जात आहे. कारण अतंत्य अद्यायवत असणाऱ्या पोलिसांच्या संगणक प्रणालीद्वारे एखादा गुन्हा दाखल होत असताना आणि शेतकऱ्यांनी सागर खोत यांचे नाव सांगितले असतानाही पोलीस मात्र चुकून नाव आल्याचे सांगत असतील तर सागराच्या लाटेत शेतकऱ्यांना तृप्ती मिळणे दुरापास्त होईल.