सातारा – येथील रा. ना. गोडबोले ट्रस्ट व सातारकरांतर्फे दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार यंदा “क्विक हील’ या देशविदेशात नामांकित असलेल्या कंपनीचे संस्थापक डॉ. कैलाश व डॉ. संजय काटकर या बंधूंना जाहीर झाला आहे. ही कंपनी गेली 25 वर्षे आयटी सिक्युरिटी क्षेत्रात कार्यरत आहे.
खटाव तालुक्यातील ललगुण या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातील या सुपुत्रांपैकी ज्येष्ठ असलेल्या कैलाश यांनी पुण्यात शालेय शिक्षण घेतानाच स्वत:चे छोटे इलक्ट्रिक वर्कशॉप सुरू केले. नाविन्याच्या ओढीने त्यांनी आयटी सिक्युरिटी क्षेत्रात पदार्पण केले. या दरम्यान संगणक क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले धाकटे बंधू डॉ. संजय यांची त्यांना साथ लाभली. “क्विक हील’ संगणक सुरक्षा प्रणालीची निर्मिती करून त्यांनी 1995 साली मार्केटिंगला प्रारंभ केला. उच्च दर्जा, उत्तम आणि त्वरित सेवा, या त्रिसूत्रीमुळे या प्रणालीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कंपनीत 1200 कुशल सॉफ्टवेअर अभियंते व कर्मचारी कार्यरत आहेत.
भारतात आणि अमेरिका, दुबई, जपान, आफ्रिका खंडातील अनेक देशांमधील शाखांच्या माध्यमातून “क्विक हील टेक्नॉलॉजी’ कोट्यवधी ग्राहक आणि बड्या कंपन्यांना सेवा पुरवत आहे. जागतिक स्पर्धेला तोंड देत कंपनीने आपले अग्रस्थान राखले आहे. काटकर बंधूंना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले असून दोन विद्यापीठांनी मानद विद्या वाचस्पती पदवीनेही गौरविले आहे. “क्विक हील’चे जनक आपल्या जिल्ह्यातीलच आहेत, हे अनेकांना माहीतही नसते. ज्ञान, विज्ञान, उद्योग, कला, क्रीडा, समाजकार्य आदी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्रास गोडबोले ट्रस्टतर्फे 1991 पासून गौरविले जात आहे. पुरस्काराचे हे 29 वे वर्ष असून यापूर्वी छोटा गंधर्व, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, शाहीर साबळे, धावपटू ललिता बाबर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रताप गंगावणे, रयत शिक्षण संस्था यांना सातारा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
ज्येष्ठ संशोधक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, पत्रकार विजय मांडके, ट्रस्टचे विश्वस्त अशोक, डॉ. अच्युत व उदयन गोडबोले यांच्या निवड समितीने काटकर बंधूंची निवड केली आहे. 25 हजार रुपये रोख व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप असून दिवाळीनंतर त्याचे वितरण होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कर सल्लागार अरुण गोडबोले यांनी दिली.