नवी दिल्ली – भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले जाईल. जर हे दहशतवादी लपण्यासाठी पाकिस्तानात पळून गेले तर तेथे घुसून त्यांना मारू असे विधान एका मुलाखतीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तानात गदारोळ माजला असून पाकिस्तानने हे विधान प्रक्षोभक असल्याचे म्हणत त्यावर टीका केली आहे.
२०१९ नंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानात घुसून आपल्या शत्रुंचा खातमा केला आहे असे ब्रिटिश माध्यम द गार्डियनच्या एका बातमीत म्हटले आहे. त्यासंदर्भात राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राजनाथ यांनी दहशतवाद्यांना पाकिस्तानात जाऊ ठार करू असे विधान केले.
दरम्यान, भारताने आपले मिशन साध्य करण्यासाठी पाकिस्तानाती गुन्हेगार तत्वांची मदत घेतली असल्याचा दावाही गार्डियनने आपल्या बातमीत केला आहे.
राजनाथ यांच्या विधानामुळे पाकिस्तानचे पित्त खवळले असून तेथील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक निवेदन जारी करून भारतावर अनेक आरोप केले आहेत. भारताच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याची आम्ही निंदा करतो तसेच पाकिस्तानात होत असलेल्या हत्यांचे पुरावे आम्ही २५ जानेवारी २०२४ रोजी दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पाकिस्तानात घुसून लोकांना दहशतवादी म्हणून त्यांची हत्या करण्याचे विधान करणे हे भारत दोषी असल्याचा पुरावा आहे. आम्ही अशा प्रकारच्या कामाची तयारी करत असल्याची भारताने दिलेली ही कबुलीच आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला अशा गंभीर आणि बेकायदेशीर कृत्यांसाठी तत्काळ उत्तरदायी ठरवणे आवश्यक असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.