नवी दिल्ली – दिल्लीतील मद्यघोटाळ्यातील आरोपींनी भाजपला निवडणूक निधी दिल्याची बाब आम्ही उघड केली आहे, त्या प्रकरणात ईडीने भाजप नेत्यांवर काय कारवाई केली अशी विचारणा करून आम आदमीपक्षाच्या नेत्या आतिशी यांनी भाजपच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
आतिशी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून त्यांनी ईडी, सीबीआय प्रमाणेच निवडणूक आयोगही भाजपची बटिक यंत्रणा झाल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने केंद्रीय यंत्रणांच्या आडून लढण्याऐवजी आमच्या विरोधात थेट मैदानात लढून दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले आहेे.
त्या आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या. निवडणूक आयोग केवळ भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने आतिशी यांना खुलासा मागणारी नोटीस जारी केली आहे.
आपल्या जवळच्या सहकाऱ्यामार्फत भाजपने आपल्याला त्यांच्या पक्षात सामिल व्हावे अन्यथा अटकेला सामोरे जावे असा निरोप पाठवल्याचा दावा आतिशी यांनी या आधीच्या पत्रकार परिषदेत केला होता. त्या प्रकरणी भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने आतिशी यांना आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरावा सादर करण्याची नोटीस जारी केली आहे.
केवळ संशयाच्या आधारावर, ईडीने आप नेते संजय सिंह, मनीष सिसोदिया आणि अगदी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक केली, जरी त्यांच्या विरोधात कोणताही मनी ट्रेल सापडला नाही.पण भाजपच्या खात्यावर यातील आरोपींचे पैसे जमा झाल्याचा पुरावा असूनही ईडी भाजपवर काय कारवाई करीत आहे असा सवाल त्यांनी केला.
मद्य घोटाळ्यातील आरोपींकडून भाजपनेच कोट्यवधी रूपयांचा निधी इलेक्ट्रोरल बॉंडद्वारे जमा केला आहे याचे पुरावेही आतिशी यांनी पत्रकार परिषदेत दिले हेाते. ही माहिती एसबीआयच्या यादीतूनच मिळते असे त्या म्हणाल्या. आता या प्रकरणी भाजप विरोधात गुन्हा दाखल करून दाखवा असे आव्हान आतिशी यांनी ईडीला दिले आहे.