पुणे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातल्या कासेगावजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या ५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कार आणि कंटेनरची धडक झाल्यामुळे हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून तीन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही कार पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होती, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. हा अपघात रात्री घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
कराड तालुक्यातून पुढे काही अंतरावरच्या कासेगावजवळ हा अपघात झाला. येवलेवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कंटेनरला पाठिमागून एमएच १४ डीएन ६३३९ हा क्रमांक असलेली कार जोरात धडकली. या अपघातात अरिंजय अण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरू अभिनंदन शिरोटे यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील दोघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आली. तसेच, इतर तीन जणांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू ओढवला आहे.