पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल आता महिनाभर लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी आता जुलैची वाट पाहवी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
करोना आणि लॉकडाऊनमुळे परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी व सबमिशनसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, या कामासाठी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विशेष परवानगी मिळवण्यातही शिक्षण विभागाला यश आलेले आहे. काही विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शाळांना थेट पोस्टानेच पाठवण्यात आल्या आहेत. उत्तरपत्रिका सबमिशनसाठीही प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांच्या ठिकाणी विशेष केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दरवर्षी दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल 10 जूनपूर्वी लावणे आवश्यक आहे. यंदा करोनामुळे निकाल लांबणीवर पडणार हे निश्चित झाले आहेत. उत्तरपत्रिका, गुणतक्ते विभागीय मंडळाकडे सादर झाल्यानंतर तीन आठवड्यांनी निकाल लावता येत असतो.
उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगही वेगाने पूर्ण करावे लागते. ही कामे पूर्ण करण्यास विलंब होणार आहे.
तपासणी झालेल्या उत्तरपत्रिकांचे संकलन वेगाने सुरू आहे. त्यामुळे निकालाच्या कामांना वेग येणार आहे. सर्वच विभागांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. कोणत्या विभागातून किती टक्के काम पूर्ण झाले, याची आकडेवारी आता सांगता येणे कठीण आहे. दहा दिवसांनी ही माहिती समजू शकेल. त्यामुळे निकालाच्या तारखा अनिश्चित आहेत.
– डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य मंडळ