गेल्या एका महिन्यापासून चीन भारतीय सीमेवर कमालीचा आक्रमक बनला आहे. सिक्कीम आणि लडाख अशा दोन ठिकाणी चिनी सैनिकांच्या हालचाली वाढल्या आहेत. भारतानेही माघार न घेता तयारी सुरू केल्यामुळे तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी अचानक चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या सीमेवरील सर्वसाधारण स्थिती आता स्थिर आणि पूर्ण नियंत्रणात असल्याचे सांगत एक पाऊल मागे घेतले आहे. तथापि, चीनची सीमाविषयक भूमिका कायम असून त्यावर आम्ही ठाम आहोत, असेही म्हटले आहे.
चीनला मुख्य राग हा पूर्व लडाखविषयी आहे. त्यामुळे या संघर्षाचे मुख्य केंद्र पूर्व लडाखच असणार आहे. पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली आणि पेंगकॉंग त्सो लेक या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताने अलीकडच्या काळात रस्ते बांधण्यास सुरुवात केली आहे. खरे पाहता, यापूर्वी चीन या क्षेत्रात उघडपणाने यायचा आणि आपली दबंगगिरी दाखवायचा. गलवान व्हॅलीवर तर आपला दावाही सांगायचा. आता भारताने तिथे रस्ते उभारणीचे काम सुरू केले असून चीनला ते खुपत असल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. कारण लडाखमध्ये संघर्षाची किंवा प्रत्यक्ष युद्धाची जरी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळी हा रस्तेप्रकल्प भारताला अत्यंत कामी येणार आहे.
विशेष म्हणजे, भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या सुमारे चार हजार किलोमीटर लांबीच्या सीमारेषेवर गेल्या चार-पाच वर्षांमध्ये भारताने अनेक ठिकाणी रस्तेउभारणी, पूलबांधणी, बंकर्सची निर्मिती असे साधनसंपत्तीच्या विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. यामुळे चीन प्रचंड संतप्त झालेला आहे. कारण आजवर चीनने भारताला गाफिल ठेवत या सीमेलगतच्या भागावर मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्तीचा विकास केला होता. सीमेवर शांतता राखण्यासंदर्भात भारतासोबत वेगवेगळे करार करून त्याआड चीनने तिबेट, नेपाळमध्ये रस्ते, रेल्वे यांचे मोठे जाळे विकसित केले आहे; परंतु डोकलामनंतर भारत अधिक सावध झाला आणि या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना दिली. यामुळे चीनचा जळफळाट झाला. यापूर्वीही चीनकडून घुसखोरी व्हायची, पण अनेकदा भारत अनेक क्षेत्रात पोहोचू शकायचा नाही. आता मात्र भारतीय सैन्यांकडून चीनला त्वरित प्रत्युत्तर दिले जात आहे, घुसखोरी अडवली जात आहे. कारण तिथपर्यंत आपण पोहोचू शकत आहोत. याचा खूप मोठा राग चीनच्या मनात आहे.
आता प्रश्न निर्माण होतो तो चीनच्या या आक्रमकतेमागचे नेमके कारण काय? यास चीनचे अंतर्गत राजकारण हे प्रामुख्याने जबाबदार आहे. करोनाचा फार मोठा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. चीनमधील जवळपास 50 टक्के उद्योग बंद पडलेले होते, ते हळूहळू सुरू झाले आहेत. चीनमध्ये बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा स्थितीत चीनमधील साम्यवादी पक्षाला जिनपिंग यांचे नेतृत्व किती कणखर आहे हे दाखवायचे आहे. 2028 पर्यंत त्यांना अध्यक्ष म्हणून ठेवायचे आहे. अशा वेळी जनतेत पसरलेला असंतोष साम्यवादी पक्षाला परवडणारा नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सध्या चीनमधील नेतृत्व आणि सरकार करत आहे.
जिनपिंग यांचे नेतृत्व कणखर असल्याचे ठसवण्यासाठी चीनच्या राष्ट्रवादी भावनेला हात घालणारे मुद्दे उकरून काढले जात आहेत. भारत-चीन सीमावाद, दक्षिण चीन समुद्र, हॉंगकॉंगचा प्रश्न या सर्वांच्या माध्यमातून चिनी जनतेला, लष्कराला भावनिक आवाहन केले जात आहे. त्यातून जिनपिंग यांच्या अपयशावर पांघरुण टाकण्याचा प्रयत्न होत आहे.
भारतावर रोष का?
1) मागील महिन्यामध्ये भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार भारतात चीनमधून एक डॉलरचीही गुंतवणूक केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय होणार नाही. यामुळे चीनला प्रचंड राग आला आहे. करोनामुळे मोडकळीस आलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा लाभ उठवत इथले उद्योगव्यवसाय आणि अर्थकारण ताब्यात घेण्याचा चीनचा कपटी डाव होता; पण त्याला आता शह दिला गेला आहे. यामुळे बिथरून जाऊन चीनने भारताला “आम्ही वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा बंद करू’ अशी धमकीही दिली.
2) पाश्चिमात्य आणि अमेरिकन माध्यमांमधून भारताची एका नव्या दृष्टिकोनातून चर्चा होत आहे. भारत हा जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनू शकतो का, असा विचार पुढे आणला जात आहे. आजवर बहुतांश देश प्रमाणापेक्षा जास्त चीनवर विसंबून होते. पण याचा गैरफायदा चीनने घेतला. त्यामुळे चीनची विश्वासार्हता घटली असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनला सोडचिठ्ठी देऊन भारत व अन्य देशांकडे वळण्याच्या मनःस्थितीत आहेत. गेल्या दोन महिन्यांत जवळपास अकराशे कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील अनेक कंपन्यांनी भारताला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. साहजिकच, यामुळे चीनच्या रागाचा पारा चढला आहे. “ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या सरकारी वृत्तपत्रातील एका लेखातून हा राग दिसून आला आहे. भारताने कितीही प्रयत्न केले तरी तो चीनची बरोबरी करूच शकत नाही, भारत हा पुरवठासाखळीचा भाग कधीच बनू शकणार नाही, अशी असूया चीनने यातून व्यक्त केली आहे.
3) गेल्या काही वर्षांत अमेरिका भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. कारण चीन आणि अमेरिकेतील संघर्ष कमालीचा वाढला आहे. दोघांतील व्यापारयुद्ध पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे अमेरिकेला भारताची मोठी गरज आहे.
या सर्वांमुळे भारतावर दबाव वाढवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. यासाठीच चीन सीमावादावर आक्रमक झाल्याचे दिसून आले.
खरंच भारत-चीन युद्ध होईल?
भारत-चीन यांच्यातील संघर्ष कितीही टोकाला गेला तरी त्याची परिणती युद्धात होईल याची शक्यता फारशी नाही. भारत-चीनमध्ये 1962 च्या युद्धानंतर एकही युद्ध झालेले नाही. मागील काळात 73 दिवस डोकलामचा संघर्ष चालला; पण अचानक चीनने तेथून माघार घेतली. त्यामुळे आताही चीन युद्धाचे पाऊल उचलेल असे वाटत नाही. सध्या मुळातच चीन अडचणीत सापडलेला आहे. अनेक देशांशी चीनचे शत्रुत्व निर्माण झाले आहे. अशा वेळी भारताशी युद्धसंघर्षाचे पाऊल चीन उचलणार नाही. कारण तसे झाले तर तो संघर्ष केवळ भारत-चीन यांच्यात राहणार नाही. अमेरिकेची मोठी मदत भारताला मिळेल. त्याचप्रमाणे जपानही भारताच्या मदतीला येऊ शकतो. याची चीनला पूर्ण कल्पना आहे. तसेच 1962 चा भारत आज राहिलेला नाही; भारताची आर्थिक, सामरिक आणि राजनैतिक क्षमता प्रचंड वाढलेली आहे, भारत हा अण्वस्त्रधारी देश आहे, आशिया खंडातील एक मोठी सत्ता म्हणून भारत पुढे आला आहे हे सर्व चीन जाणून आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष युद्ध न करता केवळ युद्धसदृश परिस्थिती तयार करून, दबाव आणून भारताने आपल्याविरुद्ध जाऊ नये हे हित साधून घेण्याचा प्रयत्न चीन करत राहील.