नगर -राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी व बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी निर्धारित स्थळी पोहचविण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सूट मिळावी, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
दहावी व बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकांकडे तसेच शिक्षण मंडळ कार्यालयात अडकून पडल्या आहेत. या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक असून, या तपासणीनंतर परीक्षेचा निकाल लागेल. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अडकून पडल्याने परीक्षेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेली विनंती मान्य करून परीक्षेच्या उत्तरपत्रिका ने – आण करण्यासाठी लॉकडाऊन काळात सुट देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली.
या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे आदि प्रयत्नशील आहे.