माणूस जेव्हा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी माझी म्हणून माणसे जोडत जातो, त्यांच्याशी नाती गुंफत जातो. त्यावेळेस नकळतच त्याचं एक स्वत:चं असं कुटुंब निर्माण होते. कुटुंब आणि त्या कुटुंबाचे पूर्ण स्वास्थ्य परस्परांच्या मधील अतूट प्रेम, दृढ विश्वास, आपलेपणा आणि जिव्हाळा ह्याच्या भरभक्कम पायावरच अवलंबून असते.
सध्याच्या “घरात बसा आणि सुरक्षित राहा’ या परिस्थितीने आपल्याला आपल्या कुटुंबाशी जवळीकता साधण्याची एक सुसंधी उपलब्ध करून दिली आहे. ऐरव्ही ऑफीसच्या कामाच्या निमित्ताने छोट्या मुलांना त्यांचा हरवलेला बाबा आणि आई, त्यांचे प्रेम, सहवास साथ सोबत सध्या मिळत आहे.
मध्यंतरीच्या काळातला एक दुरावलेला, तुटू पाहणारा कौटुंबिक सुसंवादाचा धागा पुन्हा एकदा प्रेमाच्या विणीने घट्ट होऊ पाहतो आहे. ही गोष्ट कौटुंबिक आणि सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे.
अशांच्या घरात, गावात, प्रांतात अडकून पडलेल्या लोकांच्या दृष्टीने मात्र हा काळही त्यांना मिळालेली एक भावनिक शिक्षा आहे. आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी आपण नोकरी-धंदा करतो, लहानमोठा व्यवसाय करतो, काबाडकष्ट करतो, मोलमजुरी करतो.
कित्येकांना ह्या गोष्टी करत असताना आपल्या कुटुंबापासून, गावापासून, आपल्या लोकांपासून हजारो किलोमीटर दूर जायला लागते, राहायला लागते. त्या दुराव्यातली जवळीकता अनुभवावी लागते. तरीसुद्धा माणूस हे सारं का सहन करतो. त्या परिस्थितीशी, वातावरणाशी, काळ, वेळ आणि प्रसंगाशी जुळवून का घेतो? तर आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी, त्यांच्या सुखासाठी.
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं, हे फळ्यावर लिहायला, व्यासपीठावर चार चौघ्यां देखत बोलायला चांगलं वाटत असलं तरी ह्या अशा कर्तव्य आणि भावनेत त्या कुटुंबांची फार विचित्र भावनिक घुसमट होते. मनाचा कोंडमारा होतो.
सध्याच्या परिस्थितीतील स्वत:च्या घराकडे जमेल तसा किंवा प्रसंगी पायी प्रवास करीत जाणारी माणसं, त्यांचे फोटो, बातम्या पाहिल्या, वाचल्या की त्या सर्वांचं एकच उत्तर आपल्याला मिळते ते म्हणजे, माणसाच्या मनातील कुटुंब प्रेमाची अनामिक ओढ.
– अरुण गोखले