छत्रपती संभाजीनगर – गुन्हा दाखल होण्यापासून प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी अवधी मागितला आणि तोपर्यंत गुन्हा दाखल करु नये अशी विनंती केली.
या विनंतीवरुन औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराज यांना चार आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाण्यास मुदत दिली आहे. पुत्र प्राप्तीबाबत लिंगभेदासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला आहे. म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने कायम ठेवले आहेत.
न्यायालयाच्या या निकालानंतर इंदुरीकरांच्या वकिलांनी खंडपीठात धाव घेत सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मुदत मागितली, सोबतच गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली. ज्याला खंडपीठाने होकार दर्शविला आहे.
काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असे सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असे इंदुरीकर महाराज यांनी ओझरमधील कीर्तनात म्हटले होते.