श्रीगोंदा -गणेशोत्सव संपून नवरात्रीची चाहूल लागतानाच गरम व्हायला सुरुवात होते. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधला काळ म्हणजे ऑक्टोबर हिट. गेल्या आठवडाभरापासून “ऑक्टोबर हिट’चे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. सकाळपासूनच प्रखर ऊन पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
पाऊस उघडला आणि ऑक्टोबर महिन्यात तापमानात अचानक वाढ झाली. ही तापमान वाढ उन्हाळ्याइतकीच असह्य असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर कडक ऊन आणि रात्री व सकाळी हवेत एकप्रकारचा गारवा अनुभवायला मिळत आहे. येत्या काळातही तापमानवाढ आणखी तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामानात झालेल्या या बदलाचे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. डेंगी, सर्दी-खोकला, व्हायरल इन्फेक्शन्स अशा आजारांनी डोकं वर काढले आहे.
त्याचबरोबर तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे डिहायड्रेशन, अचानक शरीरातील तापमान वाढणे, रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होणे तसेच श्वसनाचे असेही आजार उद्भवण्याची शक्यता असते, त्यादृष्टीने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ऑक्टोबर हिटच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. वाढलेल्या उन्हामुळे दुपारी रस्ते, बाजारपेठा सर्वत्र शांतता पाहायला मिळत आहे. परिणामी, कधी एकदा हिवाळा सुरु होतोय अशी नागरिकांची अवस्था झाली.