बेंगळुरु – भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला पराभूत करत 2-0 असा व्हाइट वॉश दिला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही प्रगती केली आहे.
या स्पर्धेच्या क्रमवारीत भारतीय संघ आता चौथ्या स्थानी दाखल झाला आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत प्रत्येक विजयासाठी विजेत्या सघाला 12 गुण मिळतात. श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी जिंकल्यामुळे भारतीय संघाला 24 गुण मिळाले आहेत.
चार कसोटी मालिकेत सहा विजय, तीन पराभव आणि दोन अनिर्णित असे भारताच्या नावावर आता 77 गुण आहेत. भारतीय संघ श्रीलंकेला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यापासून भारतीय संघाने कसोटी विजेतेपद स्पर्धेत यशस्वी वाटचाल सुरु झाली. भारताला इंग्लंडमध्ये चार कसोटी सामन्यात दोघांमध्ये विजय मिळाला होता. एक सामना अनिर्णित राहिला होता. एका कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला होता. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या दोन कसोटीपैकी एक कसोटी सामना भारताने जिंकला, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारताला 2-1 असा पराभव पत्करावा लागला.