बेंगळुरु – श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजय हा सर्व खेळाडूंच्या योगदानाने मिळालेला सांघिक विजय आहे, असे मत व्यक्त करत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने संघाच्या विजयासाठी सर्व खेळाडूंना श्रेय दिले आहे.
श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका भारताने 2-0 अशी जिंकली. या सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंनी जबाबदारीने खेळ केला. श्रेयस अय्यरने दोन्ही डावात अर्धशतक फटकवले व भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. हा प्रकाशझोतातील कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात आला. रोहितने अय्यर, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या खेळाडूंचेही कौतुक केलं. संघाने विजयाचा आनंद साजरा केला. प्रेक्षकांच्या उपस्थितीने या सामन्याला आणखी विशेष बनवले, असेही मत रोहितने व्यक्त केले.
आम्ही एक संघ म्हणून या सामन्याचा आनंद घेतला. आम्हाला अनेक गोष्टी साध्य करायच्या होत्या आणि आम्ही त्या केल्या. या मालिकेद्वारे रवींद्र जाडेला एक फलंदाज म्हणूनही प्रगती करत असल्याचे दिसून आले. सातव्या क्रमांकावर येऊन तो फलंदाजीला अधिक बळकटी देतो. तो एक परिपूर्ण पॅकेज आहे. त्याचे क्षेत्ररक्षण व गोलंदाजी संघाच्या विजयात मोलाची ठरते, असेही रोहितने सांगितले.
अय्यरची कामगिरी ट्रम्पकार्ड ठरली
टी-20 चा फॉर्म श्रेयस अय्यने कसोटी मालिकेतही कायम राखला. टी-20 मालिकेत तो एकदाही बाद झाला नव्हता. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या जागी तो कसोटी संघात खेळत आहे याचे त्याने भान ठेवले व सर्वोत्तम कामगिरी केली. या कसोटीच्या पहिल्या डावात श्रेयसने 92 आणि दुसऱ्याडावात 67 धावा केल्या, त्याच्या याच खेळी निर्णायक ठरल्या, असेही रोहित म्हणाला.
पंतचेही कौतुक
यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यात प्रत्येक सामन्यागणिक सुधारणा होत आहे. गेल्या वर्षी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही त्याची कामगिरी संघाच्या विजयात महत्वाची ठरत आहे. यष्टीमागेही त्याची कामगिरी सातत्याने सरस होत आहे. त्याच्यामुले संघाला एका भक्कम फलंदाजाचा लाभ झाला आहे, असेही रोहित म्हणाला. तसेच रोहितने अश्विनचेही कौतूक केले. अश्विनच्या हाती आम्ही जेव्हा कधी चेंडू सोपवतो, तेव्हा तो अफलातून कामगिरी करतो. अजून अनेक वर्ष त्याच्याकडून अशाच कामगिरीचा विश्वास आहे, असे रोहित म्हणाला.