Yashasvi Jaiswal – भारताचा नवोदित सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याची फलंदाजी करण्याची शैली मला लहान वयातील सचिन तेंडुलकरची आठवण करुन देते. सचिन उजव्या तर यशस्वी डाव्या हाताने फलंदाजी करतो हाच काय तो या दोघांमधील फरक असे मला वाटते, असे भारतीय संघाचे माजी कर्णधार व माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
भारताच्या पहिल्या डावात यशस्वीला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले होते, मात्र त्याची भरपाई त्याने दुसऱ्या डावात केली. तिसऱ्या दिवशी तो 104 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. मात्र, चौथ्या दिवशी तो मैदानात परतला आणि त्याने झटपट द्विशतक फटकावले आणि 214 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. यशस्वीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. केवळ बॅटनेच नाही तर मैदानावरील त्याची कामगिरी आणि वर्तनही उत्कृष्ट होते.
मला वाटते की पुढे जाऊन तो रोहितच्या अर्धवेळ गोलंदाजी पर्यायांपैकी एक असू शकतो. त्याला गोलंदाजीही दिली जाऊ शकते. यशस्वीमध्ये मला युवा तेंडुलकरची आठवण येते. तो मैदानावर सतत व्यस्त असतो. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर अशक्य काहीच नाही. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. यशस्वीने आपल्या कामगिरीने ती खरी करुन दाखवली आहे, असेही शास्त्री म्हणाले.
गांगुलीचा विक्रम मोडला
यशस्वीने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये 545 धावा केल्या आहेत. आता भारतासाठी कोणत्याही कसोटी मालिकेत डावखुरा फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. पण यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता, ज्याने 2007 साली पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण 534 धावा केल्या होत्या.