नवी दिल्ली – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ हा 12 व्या विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघ गुणतालिकेत 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय संघाचा 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध सामना आहे. या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी वापरणार आहे.
भारताच्या या जर्सीचे अनावरण शुक्रवारी करण्यात आलं आहे. भगव्या रंगात असलेल्या जर्सीचा वापर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात होणार आहे.
आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाची जर्सी घातली पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे.
भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध जो सामना खेळणार आहे त्यामध्ये निळ्या रंगाच्या जर्सीऐवजी भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे.
ही जर्सी या सामन्यासाठी खास नव्याने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हीच जर्सी परिधान करून भारतीय संघ त्या दिवशी मैदानावर उतरणार आहे.
या जर्सीमध्ये निळा रंग असणार आहे. पण त्यासोबतच भगवा रंगही असणार आहे. जो जर्सीच्या स्लिव्हज आणि खालील भागात असणार आहे.
टीम इंडियाला जर्सीतील हा बदल करावा लागला आहे कारण की, आयसीसीचे जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो.
भारताच्या या रंगातील जर्सीवरून राजकारणही झालं. यावर आयसीसीने उत्तर दिलं असून बीसीसीआयला आयसीसीने जर्सीचे रंग आणि डीझाईन पाठवलं होतं असं स्पष्ट केलं आहे. टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा ठेवण्यामागे युवक आणि संघाच्या बेधडक वृत्तीची प्रेरणा असल्याचं आयसीसीने सांगितलं आहे.