नवी दिल्ली – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ हा 12 व्या विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. त्यातच 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी वापरणार आहे त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघ वापरत असलेल्या जर्सीवर समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसने टीका करत केंद्र सरकार तिरंग्याचा अवमान करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता वाद अधिक रंगण्याची शक्यता आहे.
यावेळी भाजपच्या नलिन कोहली यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोणती जर्सी वापरायची हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यात आमचा कोणताही सहभाग नाही. त्यातच, तिरंग्यामधील भगवा रंग जर्सीत वापरणे हा त्याचा अपमान नसून ते राष्ट्रभक्तीचे प्रतीकही समजले जाते. कॉंग्रेसने निरर्थक वाद सुरू करू नये असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध जो सामना खेळणार आहे त्यामध्ये निळ्या रंगाच्या जर्सीऐवजी भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे. ही जर्सी या सामन्यासाठी खास नव्याने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हीच जर्सी परिधान करून भारतीय संघ त्या दिवशी मैदानावर उतरणार आहे. या जर्सीमध्ये निळा रंग असणार आहे. पण त्यासोबतच भगवा रंगही असणार आहे. जो जर्सीच्या स्लिव्हज आणि खालील भागात असणार आहे.
टीम इंडियाला जर्सीतील हा बदल करावा लागला आहे कारण की, आयसीसीचे जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. यामुळेच भारतीय संघ आपल्या नेहमीच्या जर्सीशिवाय दुसऱ्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे.