केंद्रीय अर्थमंत्री, पंतप्रधान कार्यालयाकडे 21 जून रोजी तक्रार, तक्रारदाराचीच केली बदली
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेत्याविरोधात यशस्वी शोधमोहीम राबविल्यानेच मी सर्वोच्च पदावर आहे, असे सांगत संवेदनशील प्रकरणे गुंडाळण्याचा धक्कादायक आदेश केंद्रीय कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोदचंद्र मोदी दिला. याची तक्रार मुंबईच्या तत्कालीन मुख्य प्राप्तीकर अधिकारी अलका त्यागी (युनिट 2) यांनी मोदी सरकार 2 सत्तेवर आल्यानंतर महिनाभरात म्हणजे 21 जुन रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पाठविली. यानंतर त्यांची प्रशिक्षण महासंचालक पदावर गुरूवारी बदली करण्यात आली, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळाने दिले आहे.
त्यागी यांच्या कार्यालयातर्फे त्यावेळी दीपक कोच्चर- आयसीसीआय बॅंक, काळा पैसा कायदा प्रकरणी मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना पाठविलेल्या नोटीस, जेट एअर वेज यासह अन्य काही संवेदनशील प्रकरणे हाताळली जात होती. मोदी यांच्याकडून येणाऱ्या प्रचंड दबावाबाबत सीतारामन यांच्यासह पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय दक्षता आयोग, मंत्रीमंडळ सचिवांकडे तक्रार केली. याबाबात त्यागी यांनी त्यांचे वरीष्ठ मुख्य आयुक्त एस. के. गुप्ता यांच्याकडे त्यापूर्वी लेखी तक्रार केली होती.
त्यागी 1984 च्या बॅचमधील आयआरएस अधिकारी आहेत. त्यांच्या विरोधात पुर्वी एक तक्रार दक्षता आयोगाकडे आली होती. त्यात मोदी यांनी त्यागी यांना क्लिन चिट दिली होती. त्याची आठवण करून देत मोदी यांनी त्यांच्या पदोन्नतीत अडथळा आणण्याची धमकी देत ब्लॅकमेल सुरू केले. ही तक्रार दाखल केल्यानंतर सरकारने मोदी यांना एक वर्षांची मुदतवाढ दिली. तर त्यागी यांची मुख्य आयकर आयुक्त पदावरून नागपूरला राष्ट्रीय डायरेक्ट टॅक्स अकादमीत प्राप्तीकर महासंचालक (प्रशिक्षण) म्हणून बदली करण्यात आली. त्यागी यांनी केलेल्या तक्रारीत आरोपांच्या मालिकेसह केंद्रीय कर मंडळाच्या अध्यक्षांनी संवेदनशील प्रकरण वगळण्यासाठी कसे वारंवार सांगितले याचेही कथन आहे.
एप्रीलचे अखेरचे आठवडे आणि मे 2019च्या सुरवातीला मोदी यांनी सांगितले की, संवेदनशील प्रकरणात सुरू केलेला तपास थांबवावा आणि ही गोष्ट मे 2019च्या अखेर पर्यंत करावी, असे सांगितले. ही सूचना धक्कादायक होती. ते करण्यास कठीण आहे असे सांगूनही ती वारंवार केली जात होती, असे या तक्रारीत नमूद केले आहे.