मुंबई : ‘युतीचं जागावाटप झालं आहे. आता भाजपनं त्यांच्या वाट्याल आलेल्या जागांचं काय करायचं आहे आणि मित्रपक्षाला कोणती जागा दाखवायची म्हणजे द्यायची तो त्यांचा प्रश्न आहे,’ अस बोलत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केल आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत युतीच्या मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या या संदर्भात बराच काळ गोंधळ सुरु होता. त्यानंतर भाजपानं महायुतीमधील लहान मित्रपक्षांना १४ जागा सोडल्या आहेत. त्यातील अनेकजण भाजपच्याच चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांनी उद्धव यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. मित्रपक्षांना काय जागा दाखवायची, ते भाजपानं ठरवावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मित्रपक्षांना जागा दाखवावी म्हणजे त्यांना कोणकोणत्या जागा द्यायच्या आहेत ते पाहावं, असंही लगेचच ते पुढे म्हणाले.