बारामती( प्रतिनिधी) – कोरोना सारख्या महामारीमुळे सारे जग थांबले असतानाही वीज कर्मचारी मात्र अखंडित वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यातच ‘तौक्ते चक्रीवादळाने’ विस्कळित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अविरत प्रयत्नांमुळे बारामती परिमंडलाने सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील 95 टक्क्यांहून अधिक वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश मिळवले आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी वीजपुरवठ्याचा आढावा वारंवार घेऊन प्रशासन गतीमान केले आहे. तसेच प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आवश्यक त्या भागात अतिरिक्त मनुष्यबळ देऊन काम वेळेत करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यांना लागणारे साहित्य व साधने मुबलक दिली आहेत. मात्र, वादळी वारे व पावसामुळे त्यात अडथळे येत असून, त्यावर मात करत काम सुरु आहे.
‘तौक्ते’ चक्रीवादळाने बारामती परिमंडलातील 56 वीज उपकेंद्रांना ठप्प केले होते. मात्र महावितरणने यंत्रणा युद्धपातळीवर राबवून सर्व वीज उपकेंद्रे व त्यातून निघणाऱ्या वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. कोरोना रुग्णालये, केअर सेंटर, ऑक्सीजन प्लांन्ट आदी अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा काही तासांतच सुरु केला होता. यामध्ये 54 उपकेंद्रे दुसऱ्याच दिवशी सुरु झाली. मात्र महाबळेश्वरमधील वेण्णालेक व कोळीआळी जीआयएस उपकेंद्रे सुरु होण्यास वारंवार अडथळे येत होते. काल रात्री उशिरा हे दोन्ही उपकेंद्रे पूर्ववत झाली.
बारामती परिमंडलात 7 लाख 24 हजार 388 ग्राहकांचा वीजपुरवठा चक्रीवादळाने विस्कळित झाला होता. बुधवारी दुपारपर्यंत 7 लाख 12 हजार 420 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यासाठी 623 विजेचे खांब उभे करण्यात आले. बाधित झालेल्या 1438 पैकी 1415 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. तर अद्याप गावाबाहेर, डोंगरात वस्तीकरुन राहिलेल्या 145 रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे बाकी आहे.
बारामती परिमंडलात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्याला बसला आहे. सातारा जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 595 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील 4 लाख 42 हजार 758 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप महाबळेश्वर व पाचगणी भागातील 8 हजार व कराड विभागातील 3100 ग्राहकांच्या वीजपुरवठ्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याकामी महावितरणचे व ठेकेदारांचे मनुष्यबळ अहोरात्र परिश्रम घेत आहे.