मुंबई – टाटा मोटर्स कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 1 एप्रिल पासून दोन ते अडीच टक्के दरवाढ जाहीर केली आहे. पोलाद, ऍल्युमिनियम आणि इतर कच्च्या मालाच्या दरात गेल्या एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत आहे असे टाटा मोटर्सने म्हटले आहे.
टाटा मोटर्स कंपनीने या संदर्भात शेअर बाजारांना माहिती दिली आहे. टाटा मोटर्सने आतापर्यंत दरवाढ टाळण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. मात्र सर्वच क्षेत्रांमध्ये महागाई वाढली असल्यामुळे आम्हाला दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही असे कंपनीने म्हटले आहे. याच कारणामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये ऑडी इंडिया आणि मर्सिडीज या कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे.
आगामी काळामध्ये इतर वाहन कंपन्या दरवाढ जाहीर करण्याची शक्यता आहे. इतर कच्च्या मालाबरोबरच सेमीकंडक्टरच्या तूटवड्याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यामुळे आगामी काळ वाहन उद्योगासाठी खडतर राहण्याची शक्यता आहे. एकीकडे वाहन उत्पादनाचा खर्च वाढत असताना आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे वाहन बाळगण्याचा खर्च वाढणार आहे.
अशा परिस्थितीमध्ये ग्राहक वाहनांची खरेदी कमी करतील अशी भीती वितरकांनी व्यक्त केली आहे. व्यवसायिक वाहनांचा वापर करणाऱ्या ग्राहकांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू नये अशी मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.