मुंबई – भारतामध्ये चौथ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 मध्ये घरांच्या दरात 2.1 टक्के इतकी वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर घरांच्या दरवाढीबाबत भारत 51 व्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या तिमाहीत भारत या यादीत 56 व्या क्रमांकावर होता.
भारतात 2021 च्या पहिल्या तिमाहीत घरांच्या दरात 1.6 टक्क्यांनी, तर दुसऱ्या तिमाहीत 0.5 टक्क्यांनी घट झाली होती. तिसऱ्या तिमाहीत मात्र घरांच्या दरात 0.1 टक्क्यांनी वाढ झाली. चौथ्या तिमाहीमध्ये ही वाढ 2.1 टक्के इतकी होती. नाईट फ्रॅंक या संस्थेच्या अभ्यास अहवालातून ही माहिती समोर आली आहे. घरांच्या दरवाढीमध्ये तुर्कस्थान जगात पहिल्या क्रमांकावर असून या देशांमध्ये घरांच्या दरात तब्बल 59 टक्के इतकी वाढ झाली आहे.
यासंदर्भात बोलताना नाईट फ्रॅंक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले की, लॉक डाऊनमध्ये घरांच्या निर्मितीवर आणि किमतीवर बराच परिणाम झाला होता. हा परिणाम कमी करण्यासाठी भारतासारख्या देशातील केंद्र आणि राज्य सरकारनी घर निर्मिती व विक्रीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या चालना दिली आहे. यामुळे घरांच्या विक्रीत वाढ होत आहे. त्याचबरोबर घरांच्या दरातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यानच्या काळामध्ये सर्वच कच्च्या मालाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचाही घर निर्मितीच्या खर्चावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही विकसकांना घरांच्या किमती वाढवाव्या लागत आहेत. आता परिस्थिती सुधारत असून व्याजदर अजूनही कमी पातळीवर आहेत. त्याचबरोबर काही काळ तरी ते कमी पातळीवर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतामध्ये घर विक्री वाढू शकेल असे त्यांना वाटते.
पुण्यात घरांच्या दरात घट
भारतात राष्ट्रीय पातळीवर चौथ्या तिमाहीत घरांच्या दरात 2.1 टक्के वाढ झाली असली तरी पुण्यातील घरांच्या दरात मात्र चौथ्या तिमाहीत घरांच्या दरात 0.4 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर पुण्यातील घराचे दर पहिल्या तिमाहीत 3.1 टक्क्यांनी, दुसऱ्या तिमाहीत 1.5 टक्क्याने व तिसऱ्या तिमाहीत 1.5 टक्क्यांनी कमी झाले होते. हैदराबाद शहरातील घरांचे दर पहिल्या तिमाहीत 1.3 टक्क्यांनी, दुसऱ्या तिमाहीत 1 टक्क्यांने, तिसऱ्या तिमाहीत 2.5 टक्क्यांनी तर चौथ्या तिमाहीत 4.7 टक्क्यांनी वाढले आहेत.