मुंबई – अमेरिका लवकरात व्याजदरात कपात करणार असल्यामुळे काल भारतीय शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले होते. आजही शेअर बाजारातील तेजी कायम राहिल्याचे दिसून आले. मात्र माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे निर्देशांकात जास्त वाढ झाली नाही.
बाजार बंद होताना मुंबई शहर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 190 अंकांनी वाढून 72,831 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 84 अंकांनी म्हणजे 0.84 टक्क्यांनी वाढून 22,096 अंकावर बंद झाला.
अॅक्सेंचर कंपनीने आगामी काळात कंपनीचा महसूल कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतात कार्यरत असलेल्या इतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या महसुलातही घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. अशा परिस्थितीत बर्याच गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री केली. त्याचा परिणाम मुख्य निर्देशांकावर काही प्रमाणात झाला.
अमेरिकेने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर इंग्लंडने व्याजदर सध्या तरी स्थिर पातळीवर ठेवले आहेत. मात्र लवकरच जागतिक पातळीवर व्याजदर कमी होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली नसती तर शेअर बाजाराचे निर्देशांक आणखी वाढले असते.
इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, टीसीएस, टेक महिंद्रा, बजाज फिन्सर्व, या कंपनीच्या शेअरच्या भावात घट झाली. तर सन फार्मा, मारुती, इंडसइंड बँक, टायटन, आयटीसी, टाटा मोटर्स, लार्सन अँड ट्युब्रो, जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. मुख्य निर्देशांकापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप एक टक्क्यांनी तर मिड कॅप 0.38 टक्क्यांनी वाढले.
आज झालेल्या खरेदीचा फायदा दूरसंचार, ग्राहक वस्तू, आरोग्य क्षेत्राला झाला. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे नुकसान झाले. अॅक्सेंचर कंपनीने आगामी काळात कंपनीचा महसूल दोन ते पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता या अगोदर व्यक्त केली होती. मात्र दरम्यानच्या काळामध्ये परिस्थिती नकारात्मक झाल्यामुळे आता या कंपनीचा महसूल केवळ एक ते तीन टक्क्यांनी वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
त्याचबरोबर अमेरिका व्याज दारात कपात करणार असली तरी इतर कारणामुळे डॉलर वधारला. या कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी 1,826 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली आहे. परिस्थिती अजूनही लवचिक आहे. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.