नगर – यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 हजार 337 कोटी 92 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट (टार्गेट) ठरविण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचा आराखडा तयार करण्यात आला असून, 3 मे रोजी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत या आराखड्यास मंजुरी देण्यात येणार आहे. सन 2019-20 या वर्षातील खरीप व रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचा आराखडा जिल्हा अग्रणी बॅंकेमार्फत तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार येत्या खरीप आणि रब्बी हंगामात जिल्ह्यात 4 हजार 820 कोटी 46 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये 2019-20 या वर्षातील खरीप हंगामासाठी 3 हजार 337 कोटी 92 लाख तर रब्बी हंगामासाठी 1 हजार 482 कोटी 54 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) निश्चित करण्यात आले आहे.
यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या आराखड्यास 3 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्हा बॅंकेला 1 हजार 554 कोटी 76 लाख रुपये उद्दिष्टे देण्यात आले असून राष्ट्रीयकृत बॅंक, ग्रामीण बॅंका व खासगी बॅंक या बॅंकांना 1 हजार 783 कोटी 45 लाख रुपये पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्टे ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामासाठी पतपुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे.