पारनेर -तालुक्यातील 12 गावांना यापूर्वीपासूनच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आता नव्याने 13 गावे व एका गावासाठी वाढीव खेपेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पंचायत समिती व तहसील कार्यालयातून प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच वासुंदे व वडगाव अमली या दोन गावांचे प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते पूर्ण करून पुन्हा प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येतील, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी दिली.
सभापती शेळके यांनी गटविकास अधिकारी व टंचाई विभाग यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांशी मोबाईलद्वारे फोन केला. यावेळी 16 मे रोजी सारोळा आडवाई, भडगाव, वडगाव अमली, ढोकी, पिंपळगाव तुर्क, पाळसपूर, कताळवेढा, वासुंदे, टाकळी ढोकेश्वर, सावरगाव, अक्कलवाडी, वनकुटे या तेरा गावांसाठी नव्याने टॅंकर मंजुरीचे व पिंपळगाव रोठा या गावासाठी एक वाढीव खेपेचा प्रस्ताव पाठविला आहे. बाभूळवाडे व भोयरे गांगर्ड या गावांचे प्रस्ताव अपूर्ण ते पूर्ण करून प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. तेही लवकरच मंजूर होतील.
तसेच काकाणेवाडी या ठिकाणी पाणी असल्याकारणाने तो प्रस्ताव नाकारला आहे. पण दोन दिवसांत आपण अधिकाऱ्यांसह पाहणी करून पाण्याची गरज असल्यास तो ही टॅंकर सुरू करू, असेही सभापती शेळके यांनी सांगितले. टॅंकर मंजुरीनंतर पंचायत समिती स्तरावरून मंजूर गावांसाठी टॅंकर निश्चिती करण्यात येईल व त्याप्रमाणे प्रत्येक गावाला पाणीपुरवठा करण्यात येईल. त्याचे नियोजन ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थांनी करावे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाटपाचे नियोजन करताना कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी , असे आवाहन सभापती गणेश शेळके यांनी केले आहे.