नवी दिल्ली – दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळ क्रिकेट बंद आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धा कशा सुरु करता येतील याची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी संघातील सर्व खेळाडू, मुख्य प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची तयारीही बीसीसीआयने दर्शवली आहे.
मार्चमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावरून मायदेशी परतला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार होती यातील धर्मशालातील पहिला सामना पावसाने वाया गेला तर करोनाचा धोका वाढल्याने उर्वरित दोन्ही सामने रद्द करण्यात आले. त्यानंतर देशात लॉकडाऊन लावल्याने खेळाडूंनाच नव्हे तर सर्व देशवासियांना आपापल्या घरातच अडकून पडावे लागत आहे. यातून कसा मार्ग निघणार याची चाचपणी करण्यात येत असून हा धोका कमी झाला की लगेचच सराव सत्र व स्पर्धा सुरु करता येतील का याचेही प्रयत्न चालू आहेत. येत्या काही दिवसांत भारतीय संघातील सर्व खेळाडूंना त्यांच्या व्यायामाबाबत, तंदुरुस्तीबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तसेच सपोर्ट स्टाफशी संवाद साधावा लागणार आहे. तसेच जेव्हा हा करोनाचा धोका कमी झाल्यावर खेळाडूंना ठरावीक संख्येने मैदानात जाण्याबाबत सुचवले जाणार असून तेथे अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत सराव सत्र सुरु करण्यात येईल. तसेच त्यांना फिटनेस योजना तयार करुन दिली जाणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंसाठी मानसोपचार तज्ज्ञ देखील नेमला जाणार आहे. या वृत्ताला बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही दुजोरा दिला आहे.
…तर मानधन कपात
आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर बीसीसीआयला जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. अशा स्थितीत मंडळाशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंच्या मानधनात मोठी कपात केली जाणार असल्याचे संकेत अध्यक्ष सौरव गांगुली याने दिले आहेत. आयपीएल
स्पर्धेतील संघमालक त्यांनी लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूंना करारातील रक्कम पूर्ण द्यायची का त्यात कपात करायची याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, त्यात बीसीसीआय हस्तक्षेप करणार नाही, असेही गांगुली म्हणाले.
पाच नव्हे चारच कसोटींची मालिका
करोनाचा फटका ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळालादेखील बसलेला असल्याने आगामी भारतीय संघाच्या दौऱ्यात 4 ऐवजी 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याचा प्रस्ताव त्यांनी बीसीसीआयला दिला होता. मात्र, वाढीव कसोटी सामना खेळणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट मत गांगुली यांनी दिले आहे. केवळ एकच तर सामना वाढतो असे अनेकजण म्हणतील मात्र, त्याचे आयोजन असे चुटकीसरशी होऊ शकत नाही. खूप गोष्टी याच्याशी निगडित असतात. त्यामुळे ही मालिका चारच कसोटी सामन्यांची होईल असेही गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.