चेन्नई – तमिळनाडूत अद्रमुक पक्षाचे सरकार आहे. त्या पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर आता पलानीस्वामी हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. पक्षांतर्गत संघर्षात पनीरसेल्वम या आपल्या प्रतिस्पर्ध्याला मात दिल्यानंतर पलानीस्वामी सध्या फार्मात आहेत. त्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीशी जुळवून घेण्याचे धोरण स्विकारले होते. मात्र आता पक्षावर मांड ठोकली गेल्यावर त्यांनीही भाजपला वाकुल्या दाखवण्यात सुरूवात केली आहे.
भाजपच्या आयटी सेलच्या तीन जणांनी नुकताच अद्रमुकमध्ये प्रवेश केल्यामुळे प्रदेश भाजप भडकली असतानाच पलानीस्वामी यांनी भाजपला उघडपणे आव्हानच दिल्याचे मानले जाते आहे. भाजपच्या आयटी सेलचे माजी प्रदेश सचिव दिलीप कन्नन यांच्यासह तिघांनी अद्रुमकचा रस्ता धरल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नमलाई यांनी अद्रमुकवर तोफ डागली आहे.
वास्तविक निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर होतच असते. बरेच जण आपल्या निष्ठा बदलतात आणि दुसऱ्या घरी मुक्काम हलवितात. मात्र भाजपच्या ज्या लोकांनी पक्षाला रामराम ठोकत त्यांचा प्रवेश खुद्द पलानीस्वामी यांच्याच उपस्थितीत झाला. ते भाजपच्या जिव्हारी लागले आहे. दरम्यान यावरून भाजपने त्यांना कुरूक्षेत्राची आठवण करून दिली असली तरी पलानीस्वामींच्या समर्थकांनीही भाजपला इशारा दिला आहे.
भाजपसोबत समन्वय राखण्याबाबत आम्ही पुन्हा एकदा नव्याने विचार करतो आहोत. आम्ही आता आमच्या अटींवर हे संबंध ठेवू अशी सूचक प्रतिक्रिया अद्रमुकच्या नेत्यांनी दिली आहे. जयललितांच्या निधनानंतर अद्रमुकमध्ये सत्तासंघर्ष निर्माण झाला होता. भाजप या राज्यात मुळीच प्रभावशाली नाही. मात्र राज्यातील एक प्रमुख पक्ष अंतर्गत कुरबुरींमुळे कोसळू नये याकरता भाजपच्या नेतृत्वाने तमिळनाडूत लक्ष घातल्याचे आणि जैसे थे स्थिती त्यावेळी राखण्याचे काम बजावले होते असे म्हणतात. त्याचवेळी जयललिता यांच्या एकेकाळच्या सहकारी शशिकला यांना बाजूला सारण्यासाठीही भाजपची ही खेळी होती असे तेव्हा बोलले गेले होते.
जर तेव्हा शशिकला यांनी पक्षावर वर्चस्व प्रस्थापित केले असते तर तमिळनाडूत नव्या जयललिता यांचा उदय झाला असता कारण शशिकला अगोदरच चिन्नमा म्हणून राज्यात प्रसिध्द होत्या आणि आहेत. त्यानंतर त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरूंगवारी करावी लागली. दरम्यानच्या काळात त्यांचा पक्षात जो बेस होता तो खच्ची करण्यात आला. तत्कालीन व्यवस्था म्हणून पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्यात तडजोड घडवून आणण्यात आली. त्याचवेळी लोकप्रीय अभिनेते रजनीकांत यांनाही राजकारणात आणण्याचे प्र्रयत्न भाजपकडून झाले. रजनीकांत जर भाजपकडून रिंगणात उतरले असते तर दक्षिणेकडचे आणखी एक राज्य भाजपला सहज मिळाले असते. मात्र रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत माघार घेतली आणि गणित फिसकटले.
पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी हे दोघेही नेते जयललिता यांच्या तुलनेत फारच लहान होते. त्यामुळे सरकारच्या स्थैर्यासाठी त्यांना भाजपच्या केंद्रातील सरकारशी जुळवून घेणे क्रमप्राप्त होते. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले आणि अद्रमुकमधील संघर्ष पुन्हा उफाळून आला. न्यायालयाने पलानीस्वामींच्या बाजूने कौल दिल्यामुळे सत्ता गेली असली तरीही आता ते आपले स्थान घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातूनच त्यांनी थेट भाजपमध्येच फोडाफोडी करण्याचा प्रकार अवलंबला असून भाजपला हे मानवण्यासारखे नाही.
दरम्यान, आम्ही जर खरेदीसाठी निघालो तर आमची यादी फार मोठी असेल असे अन्नामलाई यांनीही अद्रमुकला सुनावले आहे. आमच्या लोकांना फोडून ते स्वत:ला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरूनच राज्यात भाजपची काय स्थिती आहे ते स्पष्ट होते असा दावाही त्यांनी केला आहे.