रात्र आणि दिवस, अंधार आणि प्रकाश यांचा एकसारखा पाठशिवणीचा खेळ हा या निसर्गात सतत चालत आलेला आहे. तसाच तो पुढेही चालत राहणारच आहे. कारण प्रकाशाचा लोप म्हणजे अंधाराचे प्रगटन तसेच ज्ञानाचा अभाव म्हणजेच अज्ञानाचे दर्शन. अंधार पाहिला की माणसाच्या मनात भीती जागृत होते. भीती ही प्राणिमात्राची एक स्वाभाविक आणि नैसर्गिक भावना आहे.
एकदा असेच झाले, एक मनुष्य रानावनातल्या एका झाडाखाली असाच त्याच्या मनातल्या विचारांत इतका गढून गेला की त्याला भानच राहिले नाही. त्याने भानावर येऊन सभोवती पाहिले. तेव्हा सर्वत्र काळोख पसरला होता. त्याला समोर काहीच नीटसं दिसत नव्हतं. त्याबरोबर त्याच्या मनात प्रथम जी एक तीव्रभावना झागी झाली ती भीतीची. त्या बरोबरच त्याच्या अंगावर भीतीचा काटा आला.
त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याच वेळी नकळत त्याने विचाराच्या तंद्रीत हातात घेतलेले दोन दगड एकमेकांवर इतक्या ओरात घासले गेले की त्यातून दोन तीन ठिणग्या बाहेर पडल्या आणि त्या वाळलेल्या जवळच्याच गवतावर पडताच जाळ झाला आणि प्रकाश पडला. प्रकाशाचा उजेड हा जसा का त्याच्या भोवती पडला तसाच त्याच्या मनातही.
तिथेचे त्या भीतीच्या गरजेमधून प्रकाशाचा शोध हा माणसाला लागला. माणसाला प्रकाशाचा शोध लागताच त्याच्या मनातील भीतीची भावना दूर झाली.