Talathi Exam : तलाठी भरतीची याच आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर होईल. तसेच तलाठी भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमितता झाली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची सोमवार 8 जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. वाढीव गुण हा मुल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
या भरती प्रक्रियेदरम्यान एकूण 500 हरकती आलेल्या होत्या. त्यापैकी 24 हरकती स्विकारण्यात आल्या आहेत. शहीद भगतसिंग यांच्या संदर्भातील प्रश्नावर सर्वात जास्त हरकती आल्याची माहिती समोर आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे पाच हजार पदांसाठी राबवलेल्या तलाठी भरतीची गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच तलाठी भरती प्रक्रियेमध्ये 48 उमेदवारांना 200 पेक्षा अधिकचे गुण मिळाले आहेत. 200 गुणांचीच परीक्षा असताना अधिक गुण कसे मिळाले? हा मोठा गैरप्रकार आहे, भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीचे आरोप या परीक्षेची संबंधित असलेल्या मंडळींनी केले आहेत. प्रत्यक्षात असा कुठलाही गैरप्रकार नसून हे केवळ गैरसमजुत आणि अज्ञानातून घडले आहे.
सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट होते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त झाले आहेत, असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
दरम्यान, परीक्षा निकाल रद्द करू नये अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे. गेल्या वर्षी तलाठी भरती परीक्षा 3 भागात आणि 57 सत्रामध्ये घेण्यात आली आहे. या परीक्षेस महाराष्ट्र भरातून तलाठी पदासाठी 10 लाख 41 हजार 713 परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले. 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली होती.