सातारा – खंडाळा, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा या तालुक्यांमध्ये सद्यस्थितीतकमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. तसेच माण, खटाव, फलटण, कोरेगाव, वाई, कराड या तालुक्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. विहीर अधिग्रहण करण्याच्या तहसीलदारांच्या अधिकाराला या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी तहसीलदारांना दिल्या.
जिल्ह्यातील पाणी टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे तहसीलदारांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत कमी प्रमाणात पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. श्री. डुडी म्हणाले, “”पाणीटंचाईसंदर्भात सर्व तालुक्यांनी यापूर्वी आराखडे सादर केले आहेत. आराखडयातील गावांव्यतिरिक्त ज्या गावांची नव्याने मागणी येत आहे, त्यांचा समावेश आराखड्यात करून हे पुरवणी आराखडे तातडीने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यालयाकडे सादर करावेत. विहीर अधिग्रहण, टॅंकर या बाबींचा प्रामुख्याने समावेश करावा.
तसेच हे आराखडे सादर करताना संबंधित मंडलामध्ये किती टक्के पाऊस झाला आहे, या बाबतचा अहवाल संलग्न करावा.” ज्या ठिकाणी शासकीय टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो तेथील डिझेलची देयके तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करावीत. या देयकांना त्वरीत निधी उपलब्ध करून दिला जाईल. डिझेलविना गावांना टॅकर मिळत नाही अशी परिस्थिती कोठेही उदभवू नये याबाबतची सर्वानी दक्षता घ्यावी. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही डिझेल निधीची मागणी पाठविण्याबाबत यावेळी त्यांनी सूचित केले. ज्या तालुक्यामधे उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याबाबत मागणी होत आहे, त्यांनी तसा प्रस्ताव सातारा सिंचन मंडळाकडे तातडीने सादर करावेत. त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असेही त्यांनी सांगितले. ज्या तालुक्यातील पाझर तलाव, पाणीसाठे या ठिकाणी गाळमुक्तचे काम सुरु करता येणे शक्य असेल त्या ठिकाणी ते सुरु करावे. यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेऊन अथवा जे खासगी शेतकरी स्वतः गाळ उपसण्यास इच्छुक असतील त्यांना सेवाभावी संस्था गृहीत धरून त्याबाबत प्रस्ताव तातडीने मृद व जलसंधारण विभागाला पाठवावेत व ही कामे सुरु करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली.
पेरणी केवळ 50 टक्केच…
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडील अहवालाप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये प्रत्यक्ष पेरणी 1,45,292 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर करण्यात आली आहे. त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तृणधान्य व तुर, मुग, उडीद आदी कडधान्ये तसेच भुईमुग, तीळ, कारळे सोयाबीन आदी गळीत धान्य तसेच कापूस या पिकांचा समावेश आहे. दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत होणाऱ्या सरासरी खरीप पेरणीच्या प्रमाणात आजअखेर झालेली पेरणी केवळ 50 टक्केच आहे. त्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी उपाययोजनात्मक कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या.
=================