छोट्या ग्रामपंचायतींना करावी लागणार कसरत
झेडपीने फेरविचार करण्याची मागणी
वाफगाव – जिल्हा परिषदेच्या (लघू पाटबंधारे) जलसंधारण विभागामार्फत ओढा नदीवर बंधारे केटी बंधारे बांधण्यात आले आहे. यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. दरम्यान, या बंधाऱ्यांना ढापे बसवणे, काढण्याचा 50 टक्के बोजा ग्रामपंचायतींवर टाकण्यात आल्याने ग्रामपंचायतींसमोर नवे संकेट उभे ठाकले आहे.
या बंधाऱ्यांचे ढापे दसरा ते दिवाळीदरम्यान पावसाचा अंदाज घेऊन बसवले जातात. तर मे जूनमध्ये पुन्हा पुरामुळे नुकसान होऊ नये म्हणून काढले जातात. यासाठी लागणारी 100 टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडून मिळत असे; मात्र प्रशासकीय कालावधीमध्ये गेल्या वर्षी 50 टक्के रक्कम ग्रामपंचायत भरण्यास तयार आहे, असे हमीपत्रे ग्रामपंचायतीकडून जबरदस्तीने घेतली.
यामध्ये शेतकऱ्यांवर कोणताही टॅक्स नसल्याने छोट्या ग्रामपंचायतींना हा खर्च न पेलवणारा आहे. यामुळे ग्रामनिधीतून इतर होणारी गरजेची कामे करता येणार नाही.
ज्या छोट्या ग्रामपंचायत हद्दीत बंधारे आहेत त्यांना कमीत कमी 40 हजार ते जास्तीत जास्त 1 लाखांपर्यंत खर्च करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी ग्रामपंचायतींची मागणी आहे.
जिल्हा परिषदेने ढापे बसवणे व काढणे यासाठी 50 टक्के निधी ग्रामपंचायतीने भरावा, असा निर्णय नेमका का व कसा घेतला हे अद्याप समजले नाही. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे पत्र ग्रामपंचायतींना प्राप्त झाले आहे.
– मारूती थिटे, सरपंच, वरुडे