सणबूर -करोनाच्या प्रतिबंधासाठी सोमवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आमदार, खासदार यांची बैठक पार पडली. करोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता काल झालेल्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयानुसार तालुकास्तरावर सर्व उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
पाटण तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, पाटणच्या सपोनि तृप्ती सोनावणे, पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, पाटण आगाराचे आगारप्रमुख उथळे उपस्थित होते. ना. शंभूराज देसाई म्हणाले, पालकमंत्र्यांच्या अध्क्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन जिल्हयामध्ये करोनावर कशाप्रकारे प्रतिबंध आणता येईल, याबाबत काही निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करा.
पाटण तालुक्यात सुमारे 65 हजार नागरिक पूर्वीच आपल्या मुळगांवी आलेले आहेत. तर अजुनही सुमारे साडेसतरा हजार लोक मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून येणे अपेक्षित आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर तालुक्यात काय काय उपाययोजना राबवावयाच्या यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. ना. देसाई म्हणाले, दि.17 मे नंतर कदाचित लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर शहरातील नागरिक हे आपल्या मुळ गांवी परततील. परंतू करोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता प्रशासन म्हणून आपण खबरदारी घेवून काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांने होम क्वारंटाइन होणेकरीता सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत अधिकृत सूचना देण्याची अंमलबजावणी प्रशासनाने यावर प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नियंत्रण ठेवावे.