दुबई – भारतीय संघाने बुधवारी झालेल्या आपल्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यानच्या या सराव सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती व त्याच्या जागी रोहित शर्माने नेतृत्व केले. त्याने दमदार आक्रमक अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रवीचंद्रन अश्विनने आपल्या पहिल्याच षटकांत सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व मिशेल मार्शला बाद करत त्यांच्यावर दडपण आणले. ऍरन फिंचनेही निराशा केली. त्यावेळी स्टिव्हन स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. राहुल चहरने मॅक्सवेलचा अडसर दूर केला. त्याने 37 धावांची खेळी केली.
दरम्यान स्मिथने अर्धशतक पूर्ण केले मात्र, धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 48 चेंडूत 57 धावा करुन बाद झाला. मार्कस स्टोनिसने 25 चेंडूत आक्रमक 41 धावांची खेळी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारता आली. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने 2 गडी बाद केले. रवींद्र जडेजा, राहुल चहर व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 153 धावांचे आव्हान भारताने 18 व्या षटकातच केवळ 1 गडी गमावून 153 धावा करत पूर्ण केले व सोपा विजय मिळवला. कोहलीला विश्रांती दिल्यामुळे या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्माने केले. मात्र, सराव सामन्यात प्लेईंग इलेव्हनचे बंधन नसल्याने विराट कोहलीही मैदानावर क्षेत्ररक्षक म्हणून खेळत होता. तसेच त्याने रोहितच्या सांगण्यावरून गोलंदाजीही केली. त्याने 2 षटकांत 12 धावा दिल्या.
भारताने यापूर्वीच्या सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने खंबीरपणे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा सामना केला. या दोघांनी 68 धावांची सलामी दिली व संघाच्या विजयाचा पाया रचला. राहुल 31 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. त्याचवेळी रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने राहुलच्या जागी आलेल्या सुर्यकुमार यादवसह धावांचा वेग वाढवला. मात्र, रोहितला दुखापत झाल्यामुळे मैदान सोडावे लागले. त्याने 60 धावांच्या खेळीत 41 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली.
त्याच्या जागी आलेल्या हार्दीक पंड्याने सूर्यकुमारसह जबाबदारीने खेळत संघाचा विजय साकार केला. सूर्यकुमारने 27 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 38 धावांची खेळी केली. तर, हार्दीक पंड्याने 8 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 14 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍश्टन ऍगरने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया – 20 षटकांत 5 बाद 152 धावा. (स्टिव्ह स्मिथ 57, ग्लेन मॅक्सवेल 37, मार्कस स्टोनिस नाबाद 41, मॅथ्यु वेड नाबाद 4, रवीचंद्रन अश्विन 2-8, राहुल चहर 1-17, भुवनेश्वर कुमार 1-27, रवींद्र जडेजा 1-35).
भारत – 17.5 षटकांत 1 बाद 153 धावा. (रोहित शर्मा60, केएल राहुल 39, सुर्यकुमार यादव नाबाद 38 आणि हार्दिक पांड्या नाबाद 14, एॅश्टन एॅगर 1-14).