मुंबई – आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हा चुकीचा आहे. राज्यात पोलीस एखाद्या प्याद्याप्रमाणे वागत आहेत. महाराष्ट्र सरकारला जाब विचारु, पोलिसांना सुद्धा विचारु, असा पवित्रा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. तसेच याप्रकरणात मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे, कारण ते तिथेच होते. त्यांनीच सांगावं की हा विनयभंग आहे की नाही? पोलिसांनी न्यायबुद्धीने वागले पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या विवेकबुद्धीला हे सगळं पटतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने कारवाई करावी”; तक्रारदार महिलेची मागणी
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर जयंत पाटील यांनी तातडीने सांगलीतून मुंबईकडे धाव घेतली. यानंतर दोघांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
जयंत पाटील म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देणार असे म्हटले. त्यांची समजूत काढण्यासाठी मी आलोय. मी प्रवासात असताना आणि येथे आल्यावर काही माहिती घेतली. ज्या भगिनीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला त्या क्लिप सगळीकडे आहेत. जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमात त्याच महिलेला भगिनी म्हणून संबोधतात तो व्हिडीओ बघा.
याच भगिनी जेव्हा मुख्यमंत्री यांच्या गाडीकडे येतात तेव्हा जितेंद्र आव्हाड बाजूला जाण्यासाठी या महिलेला सांगतात. एवढं भाष्य करून ते पुढे निघून जातात. यापेक्षा वेगळे काही नव्हते. तरी गुन्हा दाखल होतो, हे आश्चर्य वाटते. कलम 354 म्हणजे स्त्रीला लज्जा उत्पन्न करणे, विनयभंग करणे, कामुक भावनेने बोलणे याला सुद्धा विनयभंग म्हणता येईल. माझा राज्य सरकारला आणि पोलिसांना प्रश्न आहे काल झालेली घटना या व्याख्येत कुठे बसते?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्री घटनास्थळीच होते
हे प्रकरण कलम 354 मध्ये कसे बसवले? की जाणीवपूर्वक मुद्दामहून अडकवले जात आहे. जर असेल तर कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होतात. उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी याची दखल घेतली का हे माहीत नाही. मुख्यमंत्री तर त्या घटनास्थळी होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री हे या महिलेला भेटले, याचे फोटोज सुद्धा असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.