दुबई :– टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संघाला आता पुढील सर्व सामने जिंकणे क्रमप्राप्त बनले आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत पराभव झाल्यामुळे भारतीय संघाचे सगळे गणितच बदलले आहे. तसेच भारतीय संघात पुढील सामन्यांसाठी काही बदल होण्याचेही संकेत मिळत आहेत.
रविवारी सुपर 12 गटातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला. आता भारताला आणखी चार सामने खेळायचे आहेत. जर भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे असेल तर पुढील सर्व सामने रनरेट चांगला ठेवून जिंकावे लागणार आहेत. पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केल्यामुळे केवळ विजय मिळवून भारतीय संघाला भागणार नसून विजयातही फरक मोठा असला पाहीजे. भारतीय संघाचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
त्यानंतर 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी, 5 नोव्हेंबरला स्कॉटलंडशी तर, 8 नोव्हेंबरला नामिबियाशी भारताचे सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघात काही बदल होण्याचेही संकेत मिळत आहेत.
त्यामुळे शार्दुल ठाकूरला संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते. तसेच सुमार कामगिरी केलेल्या वरुण चक्रवर्तीच्या जागी रवीचंद्रन अश्विनची संघात वर्णी लागण्याचेही सांगितले जात आहे.