दुबई – टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील लढतीत पाकिस्तानने भारताचा पराभव करत नवा इतिहास रचला. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वावरही आता टीका सुरू झाली आहे.
संघ निवड, फलंदाजीचा क्रम तसेच या सामन्यातील भारतीय क्रिकेटपटूंची देहबोली व बेजबाबदार फलंदाजी आणि दीशाहिन गोलंदाजी यावरून अन्य खेळाडूंपेक्षा कोहली जास्त टीकेचा धनी बनला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अखेरची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळत आहे. यापूर्वी भारताने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचे पाच विजय महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. 2017 सालच्या चॅम्पियन्स करंडकातील अंतिम फेरीत भारताला कोहलीच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता.
आता रविवारी झालेल्या पराभवामुळे कोहलीच्या नेतृत्वावरच जास्त टीका होऊ लागली आहे. त्याचे कर्णधारपदही या स्पर्धेदरम्यानच काढून घ्या, अशी मागणीही सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.