मेलबर्न – भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील क्रिकेटचा सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत याच दोन देशांतील सामन्याची तिकिटे तब्बल तीन महिने आधीच संपली आहेत.
यंदाच्या दिवाळीच्या एक दिवस आधी 23 ऑक्टोबरला या दोन संघात सामना होणार असून याच सामन्याद्वारे भारतीय संघ या स्पर्धेत आपली मोहीम सुरू करणार आहे. भारत व पाकिस्तान या दोन देशांतील राजकीय तणाव असल्यामुळे हे दोन देश केवळ आयसीसीच्याच अधिकृत स्पर्धेत एकमेकांशी खेळतात. त्यामुळे या स्पर्धेतही यांच्यात होत असलेला सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी ऑनलाईन तिकिटे खरेदी केली. आतापासून जवळपास तीन महिन्यांनी हा सामना होणार असला तरीही रविवारीच सर्व तिकिटे विकली गेली आहेत. चाहते या तिकिटांच्या खरेदीसाठी सज्ज झाले आहेत.
यंदाची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. स्पर्धेत भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या तिकिटांची मागणी सर्वाधिक आहे.
या स्पर्धेपूर्वी होत असलेल्या आशिया करंडक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर येणार आहेत. ही स्पर्धा यंदा श्रीलंकेत होणार आहे. मात्र, तेथील राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता अद्याप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.