“शपथविधी’बाबत राजभवनाकडून खुलासा
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेवरून झालेल्या राजकीय नाटयानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्तारावरूनही राजकारण ढवळून निघत आहे. ठाकरे सरकारच्या सत्तास्थापनेनंतर तब्बल महिनाभरानंतर येत्या 30 डिसेंबरला महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणारा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेच्या आत उरकण्याची सूचना राजभवनाकडून सरकारला देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शपथविधीच्या कार्यक्रमाबाबत राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे.
30 डिसेंबराला होणारा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला दिली नसल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही माहिती राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी पत्रकान्वये दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारातात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश असेल. मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, कोणते खाते मिळणार याची चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान, सरकारने मंत्रिमंडळ शपथविधीसाठी दुपारी एकची वेळ मागितली आहे.
राज्यपालांच्या सूचनेनंतर त्याला उत्तर दिले जाईल. सरकार जी वेळ मागते तीच वेळ दिली जाते. मात्र, आता जर दुपारी एकची वेळ घेतली आहे.
राज्यात सरकार ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंची आता अग्निपरीक्षा आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागणीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पेच निर्माण झाला आहे. सध्या सेनेकडे उद्योग खात आहे.
या खात्यासह उपमुख्यमंत्रिपदासाठी कॉंग्रेस आग्रही असल्याचे समजते. गृह खातं राष्ट्रवादीकडे असल्याने कॉंग्रेस उपमुख्यमंत्रिपदाची मागणी करत असल्याचे समजते. मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी कॉंग्रेसमध्ये बड्या नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत.
दोन माजी मुख्यमंत्री मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यायचे झाल्यास कॉंग्रेसला महत्वाची खाती हवी आहेत. यासाठीच कॉंग्रेसकडून उद्योग खात्याची मागणी केली जात असल्याचे समजते.