मुंबई – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ अशी ओळख असलेल्या मुुंबईवर मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की सलग दुसऱ्या वर्षी पत्करावी लागली आहे.
या स्पर्धेतील सामन्यात बडोद्याचा 82 धावांनी पराभव करूनही त्यांना ब गटात तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. बंगालने 5 सामन्यांत 16 गुण मिळवत कर्नाटकचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
कर्नाटकच्या नावावरही 16 गुण आहेत. मुंबईला पाच सामन्यांत 12 गुणच मिळवता आले. मुंबईला कर्नाटकने नऊ, तर छत्तीसगडने एका धावेने पराभूत केले. सलग दोन सामने गमावल्याने सलग दुसऱ्या वर्षी मुंबईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
बडोद्याविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉने 83 तर, कर्णधार अजिंक्य रहाणेने 71 धावांची खेळी करताना दीडशतकी सलामी दिल्याने मुंबईने 2 बाद 193 धावा केल्या.
प्रत्युत्तरात बडोद्याला 20 षटकांत 9 बाद 111 धावांवर रोखत विजय मिळवला. आता उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने 16 नोव्हेंबरला तर, 18 नोव्हेंबरला दिल्लीत उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवण्यात येतील.