नवी दिल्ली – देशाचे मूकबधिर कुस्तीपटू व प्रशिक्षक वीरेंद्रसिंग यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या गौरवाला दोन दिवसच होत नाहीत तोच बुधवारी वीरेंद्रसिंग यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या राजधानीतील हरियाणा भवन या निवासस्थानी आपल्या मागणीसाठी ठिय्या दिला. देशातील मूकबधिर खेळाडूंचा समावेश पॅरा गटात करण्यात यावा, ही मागणी वीरेंद्रसिंग गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत.
गुंगा पहिलवान या नावाने प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्रसिंग यांनी मूकबधिर ऑलिम्पिक
स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यामुळेच त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्काराबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले असले तरीही आपली मागणीही केली आहे. देशातील मूकबधिर खेळाडूंमध्ये अफाट गुणवत्ता असून त्यांना ती सिद्ध करण्यासाठी पॅरा गटात सहभागी करून घेतले गेले पाहिजे, अशी मागणी त्यांनी खट्टर यांच्याकडे केली आहे. याच मागणीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही संवाद साधला होता, असेही त्यांनी सांगितले आहे.
जर मला पॅरा (अपंग) खेळाडू गटात पद्म पुरस्कार मिळाला आहे तर मग याच गटातील खेळाडूंना मिळत असलेल्या सुविधा माझ्यासह अन्य मूकबधिर खेळाडूंना का मिळत नाहीत, असा सवाल वीरेंद्रसिंग यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मला रोज दोन वेळच्या जेवणाचा बंदोबस्त करण्यातही दारोदार भटकावे लागणार का, मी आजही ज्युनिअर गटाचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र, मला समान मानधनही दिले जात नाही. मी खट्टर यांच्या निवासस्थानाबाहेरील पदपथावर बसून आहे व जोपर्यंत माझी मागणी पूर्ण केली जात नाही तोपर्यंत मी येथून हटणार नाही, असेही वीरेंद्रसिंग यांनी सांगितले. केंद्र सरकारने मूकबधिर खेळाडूंना पॅरा खेळाडूंचा दर्जा दिलेला आहे तर मग हरियाणा सरकार हा देत नाही, असा सवालही
त्यांनी केला.
वीरेंद्रसिंग यांची कामगिरी
2005, 2013 व 2017 साली झालेल्या मूकबधिरांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत (डेफलिम्पिक) वीरेंद्रसिंग यांनी 3 सुवर्णपदके मिळवली आहेत. तसेच 2009 सालच्या स्पर्धेत ब्रॉंझपदकाची कमाई केली होती. तसेच त्यांनी 2016 सालच्या जागतिक मूकबधिरांच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यांनी 2008 व 2012 साली याच स्पर्धेत अनुक्रमे रजत व ब्रॉंझपदकाला गवसणी घातली होती. त्यांना 2015 साली अर्जुन पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. कारकिर्दीचा गौरव म्हणून त्यांना राज्य खेलरत्न पुरस्कारही मिळाला आहे. सध्या ते ज्युनिअर गटाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.