हिंजवडी, दि. 8 (वार्ताहर) -राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सुवर्ण व कांस्यपदक प्राप्त केले. मागील महिन्यात कल्याण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. तर गुवाहाटी (आसाम) येथील 22 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बालेवाडी-म्हाळुंगेतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या चैतन्य कुलकर्णी या राष्ट्रीय खेळाडूवर कौटुंबिक परिस्थितीमुळे हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.
घरची कौटुंबिक परिस्थिती खूपच बिकट आहे. चैतन्य हा नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो. तो नगर जिल्ह्यातील राहाता (बुद्रुक) दाढ गावचा रहिवासी आहे. 2014 साली तो द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असताना एका अपघातात त्याने दोन्ही पाय गमावले. तेव्हापासून तो कुबड्यांचा आधार घेत चालतो.
पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी तो व त्याचा भाऊ शहरात वास्तव्यास आले. 2018 पासून तो अपंग असतानाही आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुयश जाधव याच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव करू लागला. त्याच्या घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असून त्याचे वडील गावी पानटपरी चालवितात. मोठा भाऊ म्हाळुंग्यात मिळेल ते मजुरीचे काम करतो. या तुटपुंज्या उत्पन्नातून महिन्याकाठी मुश्किलीने कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. परंतु चैतन्यची धडपड, खेळाडू होण्याचे स्वप्न व सराव करण्यासाठी तसेच पैशांची चणचण असल्याने खेळासाठीचा संतुलित आहार, फळे, मांस याची कमतरता जाणवत असल्याने उत्तम क्षमता व कलाविष्कार असणारा हा उदयोन्मुख खेळाडू परिस्थितीमुळे मागे पडू नये म्हणून शासनाच्या क्रीडा विभागाने सहानुभूती दाखवत त्याच्या खेळाला प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे.
छत्रपती शिवाजी क्रीडानगरीमध्ये अनेक खेळाडू वेगवेगळ्या खेळांचा सराव करतात. त्यामुळे नियमात बसतील त्या खेळाडूंना क्रीडा विभाग सर्वोतोपरी सुविधा पुरवितो. परंतु नियमबाह्य एखादी गोष्ट केल्यास अन्य सर्व खेळाडू देखील अशा स्वरूपाची मदत मागतील. तरीही चैतन्य या जलतरणपटूबाबत काय मदत करता येईल याची माहिती घेऊन व्यक्तिगत पातळीवर किंवा विशेष बाब म्हणून आम्ही मदत करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडून करून घेऊ. – सुहास दिवसे, क्रीडा आयुक्त पुणे.
चैतन्याच्या मागणीला नकार
चैतन्यने गेल्या आठवड्यात क्रीडा आयुक्तांना पत्र लिहून मी आपल्या क्रीडा संकुलात सराव करीत असून सराव झाल्यानंतर डाएट फूड व फळे यांची कमतरता मला भासते. त्यामुळे मला सरावासाठी नितांत गरजेचा असलेला आहार संकुलाच्या कॅंटीनमध्ये देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. मात्र, क्रीडा प्रबोधनीतील खेळाडूं व्यतिरिक्त इतर खेळाडूंना विना शुल्क जेवण उपलब्ध करून देण्याची शासकीय योजना नाही. असे कारण देत त्याच्या मागणीला शासकीय स्तरावर देखील उपेक्षाच राहिली.