पुणे – एसटी महामंडळाने पुणे स्वारगेट ते मंत्रालय मुंबई अशी बससेवा गेल्या आठवड्यात सुरू केली आहे. तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. “हिरकणी’ निमआराम स्वरुपाची ही बस आहे. स्वारगेट येथून ही बस सुरू झाल्याने कामानिमित्त मंत्रालयात जाणाऱ्यांसाठी थेट बससेवा उपलब्ध झाली आहे. शिवाय, त्यामुळे रिक्षा, टॅक्सीचा खर्च देखील करावा लागत नसल्याने या सेवेला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
स्वारगेट येथून दररोज सकाळी 5.45 वाजता हिरकणी बस सुटत असून, ती साधारणपणे 9.30 वाजेपर्यंत मंत्रालयापर्यंत पोहतच आहे. त्यानंतर ही बस सकाळी 10 च्या दरम्यान मुंबई सेंट्रल आगारात दाखल होऊन तेथून स्वारगेटकडे रवाना होत आहे.
ताफ्यात नव्या “हिरकणी’
एसटीच्या ताफ्यातील जुन्या पद्धतीच्या “हिरकणी’ बस खिळखिळ्या झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर एसटी महामंडळाने स्व:बनावटीची “हिरकणी’ तयार करण्याचा निर्णय घेतला. महामंडळाच्या पुण्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत एकूण 200 नव्या “हिरकणी’ बसची बांधणी सुरू आहे. सध्या रायगड, पुणे विभागाच्या ताफ्यात नवी “हिरकणी’ दाखल झाली आहे.