हडपसर – बसस्थानकाला विनापरवाना ऑटो रिक्षाचा विळखा पडला आहे. वाहतूक पोलीस तसेच पीएमपी प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे. गाडीतळ मुख्य बसस्थानकाला चोहोबाजुंनी ऑटोरिक्षांसह अवैध वाहतूक करणाऱ्या वाहने थांबलेली असतात.
अशा रिक्षांची संख्या वाढत आहे. त्यातच प्रवासी मिळवण्यासाठी स्थानक परिसरात बाहेरून आलेले रिक्षाचालक रस्त्यावर आडव्या तिडव्या रिक्षा थांबवितात. यामुळे स्थानकात येणारे-जाणारे प्रवासी तसेच बसचालकांना बस चालविताना अडचण निर्माण होत आहे.
बसस्थानक किंवा बसथांब्यापासून ५० मीटर अंतराच्या आत रिक्षा थांबविण्यास मनाई आहे. मात्र, हा नियम हडपसर परिसरात सर्रास मोडीत काढला जात आहे. थेट बस थांब्यावर व स्थानकात रिक्षा आणून प्रवासी घेण्याचे प्रकारही सातत्याने घडत आहेत. एकीकडे शहरात अशा रिक्षाचालकांवर कारवाई होत असताना हडपसरमध्ये मात्र या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.
“याबाबत संघटनेच्या माध्यमातून व वैयक्तीकही अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही. प्रशासनाने सामान्य प्रवासी, पादचाऱ्यांचा विचार केलेला दिसत नाही. यातून संताप व्यक्त होत आहे. संबंधीत प्रशासनाने याबाबत तातडीने गंभीर भूमिका घेण्याची गरज आहे.” – पंडित हिंगे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रवासी संघ
“बसस्थानक परिसरात अनधिकृतपणे रिक्षा उभ्या असल्यास पीएमपी व आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाते. यासाठी दोन पथकांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. हडपसर परिसरात या कारवाईचे प्रमाण वाढविण्या येईल.” – अशोक साबळे, अपघात विभाग प्रमुख, पीएमपी