इंदापूर -इंदापूर तालुक्यात 68 वर्षात स्व. शंकरराव पाटील भाऊंच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने विकास झाला. यामध्ये दोन सहकारी साखर कारखाने, उजनी धरणाची निर्मिती, नीरा व भीमा या दोन्ही नद्यांवर बंधारे, जुन्या तलावाची उंची वाढवण्याची कामे याच कालावधीत झाली. तालुका 79 टक्के बागायती झाला. त्यामुळे आमच्या कालावधीत आम्ही काय केले, हे तमाम जनतेला माहित आहे.
स्वाभिमानी रक्त असल्यामुळे मी पळणारा नाही, लढणारा आहे. माझे दुसरे नाव संघर्ष आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने सात वर्षात एखादे हायस्कूल तरी काढले का? असा सवाल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता, भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचा परिवार संवाद अभियान अंतर्गत लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (दि. 5) हर्षवर्धन पाटील शेतकऱ्यांना जाहीर सभेत मार्गदर्शन करत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, संचालक उदयसिंह पाटील, बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, कृष्णाजी यादव, विकास पाटील, किरण पाटील, तानाजी नाईक, विष्णू जाधव, धनंजय गिरमे, वामन निंबाळकर, महेश निंबाळकर, जगन्नाथ चव्हाण यांच्यासह लाखेवाडी परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, लाखेवाडी गावापासूनच परिवर्तनाची लढाई सुरू झाली आहे.प्रामाणिक कार्यकर्ता काय असतो, हे गावामध्ये आल्यावर समजते. हे गावच मी आजपासून दत्तक घेत आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही.
यावेळी माजी सभापती विलास वाघमोडे, नीरा-भीमाचे संचालक ऍड. कृष्णाजी यादव यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्यांचा शाब्दिक समाचार घेतला. सूत्रसंचालन संतोष पानसरे यांनी केले. काशिनाथ अनपट यांनी आभार मानले.
दिल्ली थेट एक्सप्रेसने गाठतो
केंद्र सरकार भाजपच्या विचाराचे असल्यामुळे आपण दिल्ली थेट एक्सप्रेसने गाठतो.त्यामुळे एखादा-दुसरा कर्मचारी इकडे – तिकडे जाण्याने मला फरक पडत नाही. उगीच विरोधक आपल्या स्वार्थासाठी जातीयवादाचे विष भाषणातून पेरत आहेत. इंदापुरात भारतीय जनता पार्टीने यशस्वी आंदोलन केल्यामुळे तोडलेली वीज जोडली. हा विजय तालुक्यातील शेतकऱ्यांचा आहे. काही दिवसातच सिंचन भवनला जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांच्या वाढीव पट्ट्यांबाबत जाब विचारला जाईल, असे पाटील म्हणाले.