– शर्मिला जगताप
आजच्या थ्रीडी चित्रपट युगातही टीव्हीवर एखाद्या चॅनेलवर जुन्या जमान्यातील चित्रपट लागला असेल तर रिमोटचे नेक्स्टचे बटन दाबून पुढे जाण्याचा मोह होत नाही. या चित्रपटांची खासियतच अशी की, चित्रपटातील कथानक खूपच भावते. अभिनय जिवंत वाटतो. अशाच एका “गाय और गौरी’ या जुन्या चित्रपटाची एक आठवण.
“इंडियन वॉल्ट डिस्ने’ चिनप्पा देवर यांचा हा प्राणीपट. हत्ती, वाघ यासारखे प्राणी हाताळून झाल्यावर त्यांनी गायीकडे मोहरा वळवला. अर्थात, गायीला नायिका बनविताना हिंदी चित्रपटास आवश्यक असा मसाला ठासून भरलेला आहे. यातील नायिका म्हणजे मानवी नायिका साधीसुधी व शुद्ध भारतीय आहेच, पण प्रेक्षकांना अबला सबल झालेल्या (फक्त) पडद्यावर(च) पाहायला आवडते.
तेव्हा मुख्य नायिका गायीला मदतीला घेऊन तिने गुंडाला धडा शिकविला. नायक अरुण हा श्रीमंत जमीनदाराचा “इकलौता बेटा’. साहजिकच बिघडलेला. नायक-नायिकेचे मीलन नाट्यमय आहे. सुरुवातीला छेडछाड, त्यात गायीच्या मदतीने अरुणला नामोहरण करणे म्हणजे चक्क तुरुंगातच पाठविणे आदी सुरस घटना घडतात.
अरुण आपण सुधारल्याचे नाटक करून नायिका विजयाशी लग्न करतो. पण विवाहाच्या पहिल्याच रात्री अत्यंत नाट्यमयरितीने त्यांची पुन्हा जुदाई. पण विजया भारतीय स्त्री आहे. ती सवाई नाटक करून अरुणला जिंकून घेते. मध्यंतरीच्या काळात तिची आणि गौरीची (गायीचे नाव) ताटातूट होते. पण दरवेळी त्यांचे प्रेम श्रेष्ठ ठरते. ही गाय मात्र झकास आहे.
ती मुलांना शाळेत पोहोचवते. कधी शक्तीऐवजी युक्ती वापरून गुंडांना यमसदनी पाठविते. कधी धोक्याचा कंदील दाखवून गाडीचा अपघात टाळते. तिला मानवी भाषाही समजते. दुष्काळाच्या दिवसांत पडद्यावर तरी, एवढी धष्टपुष्ट व गोजिरवाणी गाय पाहून बरे वाटते.
चित्रपटाचा शेवट गोड आहे. हे उघड गुपित अरुण आणि विजया गौरीला आपल्या, “आणि अखेर ती दोघे सुखाने राहू लागली’ या नव्या जीवन क्रमात कायमचे स्थान देतात. या चित्रपटात विजया ही भूमिका जया भादुरी यांनी साकारली आहे.
जया यांचे हातखंडा काम आहे. अरुणच्या भूमिकेत शत्रुघ्न सिन्हा नायक व खलनायक अशा दोन्ही भूमिकेत आहेत. या चित्रपटातील गाणी लता, आशा आणि किशोर यांच्या आवाजात खुलली आहेत. “गोरी ओ गोरी’ हे प्रेमगीत किशोरकुमार यांनी झकास गायिले आहे.