जळोची – “बघा या पठ्ठ्याने तर मास्कच काढून टाकला..शूटिंग घेतोय..मास्क लावला नाही..आता सांगू का पोलिसांना उचलायला…पुन्हा म्हणाल दादा लय कडक आहे. तुझा मास्क काढल्यामुळे तुझ्या शेजारच्याला करोना होईल..आम्ही काही आमच्या स्वार्थासाठी करत नाही. समाजाचे हित साधण्यासाठी हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे,’ असे म्हणत भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका व्यक्तीची कान उघडणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाने आणि त्यांच्या रोखठोक स्वभावानेही ओळखले जातात. याचाच प्रत्यय शनिवारी बारामतीतील एका कार्यक्रमात आला. करोनाची दुसरी लाट सुरू असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नियमित मास्क लावण्याबरोबरच करोनाच्या इतर नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना आरोग्य विभाग देत आहे. असे असतानाही अनेक नागरिक विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यक्रमात विना मास्क उपस्थित असलेल्या एका नागरिकाला करोना प्रतिबंधक नियमांचे महत्त्व सांगून चांगलीच कानउघाडणी केली. “करोनाचे संकट अद्याप दूर झालेले नाही. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवले पाहिजे. स्वतःबरोबरच कुटुंबाला सांभाळले पाहिजे, मास्क लावला पाहिजे,’ असे त्यांनी नमूद केले.