मुंबई – खंडणी वसुलीप्रकरणी ठाकरे सरकारने निलंबित केलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे निलंबन शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आले आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांच्या निलंबनासाठी राज्याच्या गृहविभागाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सही करत 22 मार्च 2022 रोजी त्रिपाठी यांचे निलंबन करण्यात आले होते.
यासंदर्भात मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने त्रिपाठी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली. आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी निलंबित ठेवता येत नाही, त्यामुळे त्रिपाठींचे निलंबन मागे घेण्यात येत आहे, असे या समितीने निर्णय घेताना म्हटले आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. 16 मार्च 2022 रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना फरारी घोषित केले होते. त्रिपाठी यांच्याविरोधात पोलिसांना पुरावे सापडले होते.
दरम्यान, डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी तक्रारदाराला फोन करून तक्रार मागे घेण्यासही सांगितले होते. यासंबंधीच्या ऑडिओ क्लीपही मुंबई पोलिसांच्या हाती लागल्या होत्या.