मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.आशा नाडकर्णी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता.
आशा नाडकर्णी यांचे कुटुंब 1957 ला मुंबईमध्ये राहावयास आले आणि तेव्हापासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. 1957 ते 1973 ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट केले. नवरंग (1959), गुरु और चेला (1973), चिराग (1969), फरिश्ता (1968), श्रीमानजी (1968), दिल और मोहब्बत (1968), अलबेला मस्ताना (1967), बेगुनाह (1970) अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
आशा यांनी ल्मौसी’ चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यावेळी त्या अवघ्या 15 वर्षांच्या होत्या. त्यांना अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी आणले. त्यांनीच आशा यांना “वंदना’ या चित्रपटात संधी दिली. यानंतर आशा यांनी “नवरंग’सह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.